वेत्रवती आकाशाने देऊ
केलेली जांभळी वस्त्र लेऊन वेल्हाळ वाहत होती. काठच्या झाडांनी गोळा केलेला अंधार
नदीपात्राकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर सांडला. संध्येच्या प्रहराला पावसाळी झाकोळ
तीक्ष्ण बनून पाण्याकडे सरकला. थेंबांच्या चाहुलीने, हिरव्या सळसळीच्या उंच
टोकांवर मोरपंखी पिसा-यात लगबग झाली न् नदीमध्ये तरंग उठले.
पल्याडच्या काठाने लाल पत्थरांची
वास्तू आकार घेत होती. दिवसागणिक तिचं थरथरतं प्रतिबिंब नदीतून मोठं होऊ लागलं.
राजाने आंदोळत्या बिंबावरून
नजर फिरवली. उभ्या उंच गेलेल्या भिंतींनी त्याच्या स्वप्नांना ग्वाही दिली.
'आता कळस', राजा समाधानाने
म्हणाला.
त्याने सूचना दिल्या. शेकडो
हात झटू लागले. लाल अखंड पाषाण, साच्यात कापला जात होता. मोठ मोठे तुकडे हत्तींनी
वाहून नेले. मंदिराच्या दोन्ही दिशांनी, कितीतरी अंतरावरून शिळा रचायला सुरुवात
झाली. जमिनीलगतचा एक थर पूर्ण झाला. त्यावर आता दुसरा थर ... कारागिरांनी चौकोनी
दगड रचत आणले. भिंतींच्या वरच्या टोकापासून भूमीलगत, लांबपर्यंत उतार घडू लागला.
एक, दोन... पाच.. दहा सारंग
एका वेळेस शिखराच्या दिशेने चढत होते. चढाव फत्ते झाले. त्यांवरून आता कळसाचे अवयव
वर न्यायचे, ते जोडायचे. एकमेवाव्दितीय भव्य देवालय, भव्य शिवलिंग राजा समाधानाने
पाहत राहिला.
आयतनाच्या मागच्या बाजूने
नदीमध्ये बांध पसरलेला. त्याने नदीचं पाणी अडवून प्रजेसाठी तलाव केला होता. तलावाचं
नितळ, गोड पाणी दुभत्या जनावरांपासून माणसा – कणसांपर्यंत सगळ्यांची तहान
भागवायचं.
होशंगशहाचं शत्रुसैन्य
रात्रीतून मंदिरापर्यंत पोहोचलं. गोल बंदिस्त पाण्याभोवती वेढा घातला गेला.
"फौजेवर हल्ला करायचा नाही." त्याने पुन्हा एकदा फर्मान सोडलं. हालचालींना वेग आला. चढावाचे पत्थर एक एक करून
हटू लागले. मंदिराच्या छताचा जमिनीशी संपर्क तुटला.
मागच्या बाजूने बांधाला
जागोजागी भगदाडं पडली. तलाव बेफाम होऊन घरादारांतून शिरू लागला.
राजा हरला... सैन्य हरलं,
प्रजा हरली ... रक्ताचा एक थेंबही न सांडता होशंगशहाने लढाई जिंकली.
आजही या मंदिराला कळस नाही.
मात्र आजूबाजूला दिसतं राहतात, शिखरासाठी बांधलेल्या चढावाच्या खुणा आणि कोरडया
ठक्क तलावातली काळी पडझड.
भूपाली निसळ.
