परिकथेतल्या गोष्टींबरोबर
सांगायचास,
तू ,
इतिहासातल्या कितीतरी गोष्टी,
बोस , भगतसिंग
नी जग जींकू पाहणारा सिकंदर सुद्धा !
आठवतेय आज ही,
तू सांगितलेली
" जालियनवाला बागेची गोष्ट ".
फैरी झडत राहिल्या
हजारो निष्पाप जीवांवर
आणि
वेदना तडफडत राहिली
चारी बाजूनी उंचच उंच भिंती असणाऱ्या
बंदिस्त काळगुहेत...
आज उमगतय ,
वेदनेची जात बदलत नसते कधीच.
तुझं जाणं
तुझं नसणं
आठवण करून देत राहत
त्या रक्तरंजीत विहिरींची.
भिंतींचे टाहो
भेदत राहतात माझी काळीजभूमी.
त्या जात्या श्वासांनी,
रुजल्या नात्यांनी
एक नवा इतिहास रचला...
प्रतिकारात्मकतेचा ,
स्फुल्लिंगाचा,
आज ,
तू सांगितलेली प्रत्येक गोष्ट आठवताना
समोरची पायवाट स्पष्ट होत जाते ,
नी
मी मार्गस्थ होतो ,
एका नव्या इतिहासाच्या दिशेने !
No comments:
Post a Comment