
दामाजीने भेगाळलेल्या जमिनीवरून नजर फिरवली. कोरडया आकाशाचं रिकामं पोट पाहून त्याला गलबलून आलं.
पावसाने पाठ फिरवली होती. जमिनीला पडलेल्या भेगा कोरड्या होत, रोज अजूनाजून तुटत चाललेल्या.
गुरं – ढोरं चारा-पाण्याविना जागोजागी मेलेली दिसू लागलेली.
घोडयावर मांड टाकून त्याने किल्ल्याचा रस्ता धरला. दामाजी म्हणजे सुलतान हुमायूँ शाहचा धनपाल ! कामाला आणि हिशोबाला चोख असलेला दामाजी सुलतानाच्या खास मर्जीतला !
वेशीतून अश्व वेगाने आत शिरला. दामाजीने तडक कोषागार गाठले. कोषागाराच्या उंच भिंती पाहताना तो क्षणभर थबकला. त्याने डोळे मिटले. डोळ्यांसमोर आलं नदीचं निश्चल पात्र अन् हतबल प्रजा.
‘कोषागारात इतका धान्यसाठा असताना प्रजेने उपाशी मरावं ? छे..छे हे योग्य नव्हे. विठ्ठला, मी काय करावं? राज्यातील बायका-पोरं अशी तडफडताना कशी बघू ?’ तो स्वतःशीच बोलला.
‘दामाजी कोषागारातील अन्नधान्य वाटत सुटला आहे,’ सुलतानापार्यंत बातमी पोहचली.
“गिरफ्तार करून माझ्या समोर हाजीर करा त्याला” हुमायूँ गरजला.
त्याने दामाजीला आजन्म कारावासाची शिक्षा दिली. “राज्याचे कोषागार फुकट वाटण्यासाठी नाही दामाजी” तो क्रोधाने म्हणाला.
“प्रजेला खायला अन्न नाही.. नदी कोरडीठक्क पडली आहे. त्यांचे हाल मला बघवेना बादशाह,”
दामाजीने हात जोडले, “विठूराया ... मला योग्य वाटलं तेच मी केलं रे... तुला योग्य वाटेल ती शिक्षा मला दे... विठ्ठला...”
एके दिवशी एक महाराचं पोरगं किल्ल्याच्या वेशीपाशी येऊन थांबलं. लहानखुरं आणि खपाटीला गेलेलं
पोट !
‘मला सुलतानांना भेटायचं आहे’ त्याने चौकीदाराला सांगितलं.
‘कोण रे तू ?’ चौकीदारने दूर लोटत त्याला विचारलं.
“मी श्रीहरी ! दामाजींचा निरोप घेऊन आलोय. मी त्यांच्याकडेच चाकरीला असतो. मला सुलतानांना निरोप पोहचवायचाय.” पोरानं उत्तर दिलं.
“बादशाह, दामाजीपंत म्हणजे विश्वासू चाकर ! मी त्यांना नेहमी तुमच्याशी, राज्याशी इमान राखतानाच पाहिलं आहे. त्यांना कसली शिक्षा देता आहात ? त्यांनी तर तुमचा फायदाच पाहिला.” सुलतानासमोर उभा असलेला श्रीहरी धिटाईने बोलला.
“इमान ? कैसे ?” सुलतानाचा प्रश्न.
“हे काय, धान्य वाटलं त्याच्याबदल्यात मिळालेल्या मुद्रा.” श्रीहरीने सोबत आणलेला वस्त्रकोश हुमायूँसमोर रिता केला.
दामाजीला पुन्हा दरबारात आणलं गेलं. मुद्रा पाहून खुश झालेल्या सुलतानाने त्याला शिक्षेतून मुक्त झाल्याचं सांगितलं आणि केलेल्या कामासाठी तो त्याला शाबाशी देऊ लागला.
दामाजी गोंधळला, “श्रीहरी? मी तर कोणा श्रीहरिला ओळखत नाही सुलतान.”
“छोटा बच्चा श्रीहरी ! तुझ्याकडेच चाकरी करतो तो. उसने ऐसे कहाँ |” आता सुलतान देखील संभ्रमात होता.
क्षणभरचं... दामाजीला उलगडा झाला, “श्रीहरी... विठ्ठल ... सुलतान, साक्षात विठ्ठल आपल्या भेटीला आला होता. माऊलीने मला सोडवलं... विठुराया...” त्याने डोळे मिटून हात जोडले.
दामाजीची पुण्याई अशी की आजही किल्ल्याच्या वेशीवर श्रीहरीची पावलं आहेत. एका वेशीत एक पाऊल तर दुसऱ्या वेशीत दुसरं....
सुरकुतलेला, थरथरता हात पावलावर फुलं वाहतो. उदबत्तीचा दरवळ पसरतो. पावलांमागची कहाणी संपलेली असते. ‘इथे डोकं टेका रे पोरांनो. ही जागा साक्षात पंढरी आहे. एक इथं आणि एक त्या तिकडं पलीकडल्या वेशीत,’ सांगता सांगता आजीचा हात पाठीवरून फिरतो आणि जाणवतं ‘विठू माऊली खरंच इथेच आहे.’
भूपाली निसळ.
मस्त.
ReplyDeleteThanks a lot :)
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteखूप आभार :) _/\_
DeleteFaith makes it possible to hope.
ReplyDeleteNice depiction as always!
Well said..... :) thanks a lot
ReplyDelete